Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

अदभूत रस हा बाल साहित्याचा आत्मा : भारत सासणे यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 25 December 2024 09:19 PM

अदभूत रस हा बाल साहित्याचा आत्मा : भारत सासणे यांचे प्रतिपादन


दखनी स्वराज्य, पुणे : 

अदभूत रस हा बालसाहित्याचा आत्मा आहे. मात्र अलीकडच्या काळात बाल साहित्यातून अदभूत रस हरवला आहे. त्याची जागा माहितीपर साहित्याने घेतली आहे. हे माहितीच्या महाजालाचे युग आहे. त्यामुळे माहितीच्या महाजालासह पुन्हा एकदा बाल साहित्यात अदभूत रस निर्माण करणे हे बाल साहित्यिकांसमोरचे मोठे आव्हान आहे. असे मत ज्येष्ठ बाल साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केले.
साने गुरूजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे मुलांनी मुलांसाठी लिहिलेल्या कथापंचक या कथा संग्रहाचे प्रकाशन बालसाहित्यिका व ग. दि. माडगूळकर यांची पणती पलोमा माडगूळकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात सासणे बोलत होते. यावेळी मनशक्तीच्या संपादक डॉ. वर्षा तोडमल, संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी उपस्थित होते.
सासणे म्हणाले, अदभूत तसेच रसात्मक बाल साहित्यातून मुलांमध्ये शोधक वृत्ती तयार होते. या शोधक वृत्तीची तहान भागविण्याची जबाबदारीही बाल साहित्यिकांवर आहे. कथेच्या वेगळेपणात उद्याचे यश दडले आहे. त्यामुळे एक कथा लिहून थांबू नका, तसेच कोणाचे अनुकरणही करू नका असा सल्लाही सासणे यांनी मुलांना दिला. चित्रकथेचा प्रयोग बाल साहित्यात व्हावा, तसेच मुलांसाठी चांगल्या पुस्तकांची यादी संस्थेने उपलब्ध करून द्यावी, अशी सुचनाही सासणे यांनी केली.
पलोमा माडगूळकर, माधव राजगुरू, अनिल कुलकर्णी, वैदेही कुलकर्णी, मृणालीनी वनारसे यांनी मनोगत व्यक्त केले. चिन्मयी शेटे आणि शाल्वी कुलकर्णी या विद्यार्थींनीनी भावना व्यक्त केल्या. पुस्तकातील सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रज्ञा देशपांडे यांनी सुत्रसंचालन केले. सचिन बेंडभर यांनी आभार मानले.  

संकुचित दृष्टीकोन बदलावा

मुलांच्या मेंदुची मशागत करण्यासाठी बाल साहित्य हा अंत्यत महत्त्वाचा साहित्य प्रकार आहे. मात्र त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारच संकुचित आहे. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे. आज साहित्यिक स्वत:ला बाल साहित्यिक म्हणून घेण्यास तयार नाहीत, हे फार दुदैवी आहे. मुलांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. मात्र शिक्षकांना इतर कामात गुंतविले जात आहे. आजची पिढी खुप हुशार आहे. त्यांना केवळ चांगले वळण देण्याची गरज आहे. अद्यापही सर्वत्र अंधारलेले नाही, काही प्रकाशवाटा आहेत. त्या प्रकाश वाटा म्हणजे अशा संस्था आहेत.

- डॉ. वर्षा तोडमल, संपादक, मनशक्ती