संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
'वाचक चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी करायची तर ग्रंथपालांनी केवळ सभासदांपुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता ज्या परिसरात आपले ग्रंथालय आहे, त्या परिसरातील नागरिकांना ग्रंथालयांबद्दल आपुलकी निर्माण होईल असे उपक्रम राबवले पाहिजेत', असे प्रतिपादन न्यायमूर्ती अंबादासराव जोशी यांनी केले. प्रज्ञा सारंग देशपांडे यांना कै.ल.स.वैद्य शालेय ग्रंथपाल पुरस्कार प्रदान समारंभात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आर्य चाणक्य विद्याधामचे कार्यवाह वामन नारायण देशपांडे उपस्थित होते.
शालेय ग्रंथपाल म्हणून प्रदीर्घकाळ उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या ग्रंथपालांना हा पुरस्कार दरवर्षी जीवन विकास ग्रंथालयातर्फे देण्यात येतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती देवी, महाराजा सयाजीराव गायकवाड आणि ल.स. वैद्य यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांनी केले. जीवन विकास ग्रंथालयाचे कार्यवाह डॉ. राजशेखर बालेकर यांनी प्रास्ताविकातून ग्रंथालयाचे विविध उपक्रम आणि पुरस्कार योजनेविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एस.बी. ओ.ए. पब्लिक स्कूलच्या ग्रंथपाल सौ. प्रज्ञा सारंग देशपांडे यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र, पुष्पगुच्छ या स्वरूपात हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सुहास वैद्य यांनी गौरव पत्राचे वाचन केले. प्रमुख अतिथी वामन नारायण देशपांडे यांनी विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये वाचनाची गोडी लावण्यासाठी विविध उपक्रम ग्रंथपालांनी राबविले पाहिजे असे आवाहन करून या संदर्भात सविस्तर चिंतन प्रकट केले. वैद्य कुटुंबियांचे प्रतिनिधी म्हणून प्रकाश वैद्य यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विनोद सिनकर यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, भा. बा. आर्वीकर, डॉ. हिंदु गुरसहानी, देविदास देशपांडे, अशोक लाटे, महेश बावस्कर, मुख्याध्यापिका सौ. माधुरी पुरंदरे, मधुकरअण्णा वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर आणि रसिक, वाचक, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.