संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
येथील छत्रपती शाहू महाविद्यालयात १३ जानेवारी २०२५ रोजी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवाविवेक वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण २७ स्पर्धकांनी भाग घेतला. स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांच्या विचारांवर आधारित या स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागृती निर्माण केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे संदीप भाऊ आमराव व राहुल कुमार नळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास भरत पाटील उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी वक्त्यांनी स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे महत्त्व तरुणाईसमोर मांडले.
स्पर्धेचे मुख्य संयोजन ऍड. जालिंदर जगताप, कल्पेश गायकवाड, तारा झिमन, डॉ. हर्षल पवार आणि घनश्याम जगताप यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी जिजाऊंच्या कर्तृत्वाचा व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनदर्शनाचा अभ्यासपूर्ण ऊहापोह करत प्रभावी भाषण केले.
स्पर्धेचा निकाल जाहीर करताना प्रथम क्रमांकाचा मान व्यंकट शिंदे (नांदेड) यांनी पटकावला. त्यांच्या सशक्त आणि प्रेरणादायी वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या शेवटी बक्षीस वितरण समारंभात मीनाताई पांडव, डॉ. संजय थोरात, योगेश गोटे व महेश खेडकर यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना सतत शिकण्याची व विचारशक्ती प्रगल्भ करण्याची प्रेरणा दिली.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, वक्तृत्व कौशल्य आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांविषयी आत्मीयता निर्माण झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांच्या विचारांची आजच्या पिढीला खरी गरज असून अशा स्पर्धा तरुणाईस स्फूर्ती देणाऱ्या ठरतात, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. छत्रपती शाहू महाविद्यालयाने दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, अशी मागणी उपस्थितांनी केली.
कार्यक्रमाचा समारोप आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात झाला.