संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
निरगुडी बु. ता. खुलताबाद ग्रुप ग्रामपंचायत मधील ठाकरवाडी वस्ती जल जीवन मिशन योजनेपासून वंचित राहिल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. हर घर नल प्रत्येक घराला पाणी ही भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने 2019 मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली योजना आहे. ज्याचा उद्देश 2025 पर्यंत दीर्घकालीन आधारावर दररोज प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला किमाध 55 लिटर नळाचे पाणी नियमितपणे पुरवणे हा उद्देश आहे. ऑगस्ट 2019 मध्ये मोदी सरकारने केलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची (NRDWP) पुनर्रचना असून. 15 ऑगस्ट 2019 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3.60 लाख कोटी रुपयांच्या बजेट अंतर्गत 2025 पर्यंत भारतातील ग्रामीण घरांना पिण्याच्या पाण्याची जोडणी देण्याचे उद्दिष्ट मांडले. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा 2.08 लाख कोटी आहे. या योजनेत केंद्र सरकार-केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100:0, केंद्र सरकार- ईशान्य राज्ये/हिमालयीन राज्य सरकारांमध्ये 90:10 टक्के आणि केंद्र सरकार आणि इतर राज्य सरकारांमध्ये 50:50 या प्रमाणात खर्च वाटप करण्याची कल्पना आहे. इतकं बजेट शासनाने दिलेले असतांना ही खुलताबाद तालुक्यातील निरगुडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेली 95% आदिवासी ठाकरवाडी आजही जल जीवन मिशन योजने पासून वंचित आहे. ही योजना आदिवासी ठाकर समाजासाठी योजना फक्त योजना बनून राहीली आहे. ठाकरवाडीच्या शिवारातील धरण असून सुद्धा या वाडीला या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे. निरगुडी बु. ठाकरवाडी धरणातून चिंचोली, पळसवाडी,पळसगांव, तिसगाव अशा लांब-लांब च्या गावांना या योजनेतून विहीर, पाइपलाइन केल्या आहेत. परंतु धरणाच्या शिवारात असून सुद्धा जल जीवन मिशन योजनेपासून ठाकर वाडीला वचित ठेवण्यात आलं आहे. ग्रामपंचायत या योजनेकरीता दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. ग्रुप ग्रामपंचायत कडून ठाकरवाडी करीता जल जीवन मिशन योजने संदर्भात कोणतेही कागदपत्रांची हालचाल दिसून येत नाही.