Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

नवीन कायद्याविषयी जनजागृती व्हावी म्हणून पैठण पोलिसांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 28 February 2025 08:35 AM

नवीन कायद्याविषयी जनजागृती व्हावी म्हणून पैठण पोलिसांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन 


दखनी स्वराज्य वृत्तसंस्था (पैठण) -

 नवीन कायद्याविषयी जनजागृती व्हावी व त्याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात "नवीन कायद्याविषयी जनजागृती" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पैठण चे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली.
मंगळवार दिनांक २५ रोजी, पैठण पोलिस स्टेशन आयोजित व शालिवाहन पतसंस्थेच्या सौजन्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रसंगी आपल्या प्रास्ताविक मध्ये बोलताना शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चौहान यांनी , कायदा माहित नाही असे म्हणून आपण कायद्या पासून वाचू शकत नाही. बँकिंग क्षेत्रात काम करत असताना पोलिस प्रशासनाची पर्यायाने कायद्याची नेहमी गरज भासते. दैनंदिन जीवनात कायद्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने सामान्य जनतेला नवीन कायद्याची माहिती व्हावी म्हणून पोलिस प्रशासनाने आयोजित केलेली आजची कार्यशाळा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले.
प्रसंगी एम.पी.डी.ए. व मोकाका या कायद्याविषयी मार्गदर्शक म्हणून पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर सेवानिवृत्त झालेले व सध्या माननीय उच्च न्यायालय येथील 
अँड. श्री द्वारकादास भांगे यांनी मार्गदर्शन करतांना, संघटित गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी वरदान ठरलेल्या "मोकाका" कायदा निर्माण करण्यामागे महाराष्ट्र पोलिसांचे भरीव योगदान आहे. टाडा व पोटा कायदा कालबाह्य ठरल्याने संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी "मोकाका" कायदा भारतामध्ये व्यापक स्वरूपात अमलात आणला जात असल्याने ही महाराष्ट्र पोलिसांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन केले. तसेच सदर जनजागृती  कार्यशाळेमध्ये लाभलेले कायदेविषयक मार्गदर्शक  अँड. राजेंद्र गोर्डे यांनी "भारतीय साक्ष अधिनियम" या विषयावर बोलताना , AI च्या युगात नवनवीन पद्धतीद्वारे पुरावा कसा जतन करावा, कसा सिद्ध करावा या विषयी मार्गदर्शन केले. जलद न्याय देताना घाई झाली व काही पुरावे मागे राहिल्यास निकाल चुकू शकतो म्हणून भारतीय साक्ष अधिनियम कायदा महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले.
तर अँड. प्रितम साबू यांनी  "नवीन कायदे व त्याचे परिणाम" या विषयावर बोलतांना, नवीन कायदे प्रणालीमध्ये जलद न्याय या संकल्पनेवर भर देण्यात आला असून "तारीख पे तारीख" ची संकल्पना संपवण्यासाठी नवीन कायद्यातील तरतुदी फायदेशीर आहे. या मध्ये शिक्षा ऐवजी न्यायावर भर देण्यात आलेला असून त्याचे द्योतक म्हणून भारतीय दंड संहितेचे नामकरण भारतीय न्याय संहिता करण्यात आल्याचे नमूद केले. 
तसेच अँड. संदीप जाधव यांनी भारतीय दंड संहितेतील भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये बदल झालेल्या महत्वपूर्ण कलामांविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पैठण चे तहसीलदार सारंग चव्हाण व पैठण पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी खुले कारागृहाचे पोलिस निरीक्षक दीपक भोसले, पोलीस स्टेशन बिडकीनचे सहायक पो.नि. शेळके, पोलीस स्टेशन एम. आय. डी. सी. पैठण चे  पो. नि. ईश्वर जगदाळे, पो.उप.नि. दशरथ बुरुकुल, एकनाथ नागरगोजे, नायब तहसीलदार बनसोडे, पो.ह.श्री नरेंद्र अंधारे, राजेश आटोळे, श्रीराम चेडे, दिनेश दांडगे, कल्याण ढाकणे, मनीष वैद्य, राजेंद्र रोहरा, कल्याण बरकसे, शालिवाहनचे मुख्य अधिकारी शिवाजी घोडसे, रामदास संदलसे तसेच विविध संस्था, प्रशासकीय कर्मचारी, पोलिस अधिकारी आणि अंमलदार , पैठण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
सूत्रसंचालन शालिवाहनचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण गायके यांनी केले. तर कार्यशाळा यशस्वितेसाठी शालिवाहन च्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.