Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

२रे शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री आशा डांगे

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 16 January 2025 06:53 PM

२रे शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री आशा डांगे


दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर


जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर (शिक्षण विभाग) आयोजित २रे शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, श्रीमती आशा डांगे यांची निवड एकमताने निवड करण्यात आली आहे, असे जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाटकर पानसरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर मॅडम, योजनाच्या शिक्षणाधिकारी अरुणा भूमकर मॅडम, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण मॅडम, अंग्लभाषाच्या संचालक डॉ.राठोड मॅडम, डायटच्या प्राचार्या देशमुख मॅडम, डायटचे ज्येष्ठअधिव्याख्याता डॉ. विशाल तायडे सर आणि पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनाचे मावळते संमेलन अध्यक्ष डॉ.हबीब भंडारे या
सात सदस्यीय निवड समितीने संमेलना अध्यक्षांची  निवड केलेली आहे. या निवडीने यावर्षी महिलाराज असल्याचा आनंद वाटतो, असे अभिनंदनीय उद्गार माजी संमेलनाध्यक्ष तथा प्रसिद्ध साहित्यिक हबीब भंडारे म्हणाले.

संमेलनाध्यक्ष आशा अशोक डांगे यांचा अल्प परिचय 

 आशा डांगे या बळीराम पाटील विद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या 27 वर्षापासून सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. डी.एड., बी.एड.,एम.ए. मराठी आणि इतिहास, एम.एड., शिक्षणशास्त्राची सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असून शिक्षणशास्त्र विषयात त्या पी.एचडी. करत आहेत. बालभारती पुणे कार्यानुभव व मराठी विषयाच्या पुस्तकांचे समीक्षण समिती त्या कार्यरत होत्या. अनेक शिक्षक प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.  परिघाबाहेर आणि  प्रिय, हा कण गॉड पाटील आहे हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या साहित्यिक कार्याबद्दल अनेक मान्यवर साहित्य संस्थांचे पुरस्कार आजपर्यंत त्यांना मिळालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कवितासंग्रहांचे हिंदी,  गुजराती अशा विविध भाषांमध्ये अनुवाद देखील झालेले आहेत. पहिल्या शिक्षक साहित्य संमेलनामध्ये तयार करण्यात आलेल्या काव्यदिंडी या कवितासंग्रहाच्या संपदानामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. कथा नवलेखकांच्या हा संपादन ग्रंथ ही त्यांच्या नावावर आहे. विविध परिसंवाद, कवी संमेलने, साहित्य संमेलने यात त्यांचा सहभाग असतो. महाराष्ट्रातील अनेक अग्रगण्य दैनिकातून आणि नियतकालिकातून त्यांचे लेख, कविता, कथा प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.