Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

संगणक हा शिक्षकाला पर्याय असूच शकत नाही - मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 04 June 2025 08:51 PM

संगणक हा शिक्षकाला पर्याय असूच शकत नाही - मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी


दखनी स्वराज्य वृत्तसेवा : 

 पैठण येथील विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 'शिक्षक प्रशिक्षण शिबिर 2025' आयोजित केलेले असून 4 जून रोजी नवव्या दिवसाच्या सत्रात श्री भास्कर कुलकर्णी, मुख्याध्यापक आर्य चाणक्य विद्या मंदिर पैठण यांनी मार्गदर्शन केले. "शाळेची खरच! गरज आहे का?" या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, आजच्या  विद्यार्थ्यांना संगणक एका क्लिक मध्ये जगातील कोणतीही माहिती उपलब्ध करून देते. परंतु असे असले, तरी संगणक हा शिक्षकाला पर्याय असू शकत नाही. विद्यार्थ्यांना भावना असतात, संवेदना असतात या समजून घेण्यासाठी शाळेत शिक्षक हाच पर्याय आहेत. एका काळी तक्षशिला, विक्रमशील, नालंदा असे जगात नावजलेले मोठे विद्यापीठ आपल्या देशात होते. आज मात्र वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. आता ही समस्या अकरावी आणि बारावीत डोकावत आहे. खाजगी कोचिंग आणि ऑनलाइन शिक्षणात उच्च माध्यमिक शाळा वस पडत आहेत. पुढे हा धोका शाळेला होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना आवडणारे शिक्षण आपण उपलब्ध करून दिले पाहिजे. शिक्षणासाठी शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे, असे ही श्री कुलकर्णी म्हणाले. सद्यस्थितीत शिक्षक व पालक यांच्यात अंतर वाढताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक पालक समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे.  पुढे बोलताना संगणक, गुगल जे देऊ शकत नाही ते शिक्षक शाळेमध्ये देतात हे समजून सांगताना ते म्हणाले, शिक्षक विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस घडवण्याचा प्रयत्न करतात. शाळेतील विविध प्रसंगातून अपयश पचवण्याची शक्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. शाळेत बालकाच्या मनाचा विचार होतो. तो संगणक करु शकत नाही. शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये भावनिक विकास घडवून आणत मैत्री भाव विकसित करण्याचा प्रयत्न करतात. हे महाभारतातील कृष्ण व सुदामा व इतर उदाहरणे देत त्यांनी समजून सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार नियमित त्याच्या वर्तनाच्या, इतर गोष्टीचे निरीक्षण करत त्याच्यातील चांगले गुण ओळखून सकारात्मकतेला वाव देत, पालकांशी संवाद साधून ते गुण विकसित करण्याचा प्रयत्न करा, असा मौलिक सल्ला त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिला.  त्यातून देशाला अपेक्षित असलेला सर्व गुणसंपन्न असा माणूस घडवण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे, असे याप्रसंगी त्यांनी सांगितले. शिबिरास विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संतोष पाटील तांबे, आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर. बी. रामावत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एम. के कोळगे, तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सारिका धोकटे यांनी केले. प्रास्ताविक मंगल कोळगे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय संदीप तांबे यांनी दिला. आभार आर.बी. रामावत यांनी मानले. दिनांक ५ जून रोजी शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे समारोप सत्र आहे.