Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

शेती क्षेत्रात प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांना विद्यापीठांनी दरवर्षी ‘ॲग्रो सायंटिस्ट’ म्हणून मानद पदवी दिली पाहिजे...

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 29 May 2025 07:59 PM

शेती क्षेत्रात प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांना विद्यापीठांनी दरवर्षी ‘ॲग्रो सायंटिस्ट’ म्हणून मानद पदवी दिली पाहिजे...


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे  ’53व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकी‘चे आणि ‘विकसित कृषी संकल्प अभियाना‘चे उदघाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने ICAR मार्फत एक नवीन योजना सुरू केली आहे. विविध संशोधन केंद्र व ICAR चे अधिकारी आणि संशोधक शेतकर्‍यांच्या बांधावर जाणार आहेत. यामुळे संशोधक व शेती यांच्यामध्ये थेट संवाद होईल. यासाठी पुढील 15-20 दिवस एकात्मिक कार्यक्रम राबवला जात आहे, ज्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रदेखील ‘व्होल ऑफ द गव्हर्नमेंट’ दृष्टिकोन ठेवून अधिकारी आणि संस्था मैदानात उतरवेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याकडे 79% शेतकरी हे अल्पभूधारक असल्यामुळे त्यांची शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता कमी आहे. यासोबतच हवामान बदलामुळे जुन्या पद्धतीने शेतीक्षेत्रासमोर नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. यामुळे ‘प्रोटेक्टिव्ह फार्मिंग’ करण्यासाठी शेतीमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.  लहरी निसर्गावर शेतीच्या दुष्टचक्रात फसलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याचे काम शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून करत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कृषी विद्यापीठ आणि विविध बियाणांच्या कंपन्यांमध्ये काम करणार्‍या शास्त्रज्ञांसोबत शेतकरी देखील शास्त्रज्ञच आहेत. अनेक शेतकरी लागवडीच्या विविध पद्धती विकसित करतात, त्यातून शेतीचे उत्पन्न वाढते आणि शेतकऱ्यांनाही फायदा होता, शेती क्षेत्रात नवनवीन यशस्वी प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांना दरवर्षी ‘ॲग्रो सायंटिस्ट’ म्हणून मानद पदवी दिली पाहिजे, या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा मिळेल.

मुख्यमंत्री म्हणाले की, शाश्वत आणि हवामान अनुकूल शेतीसाठी ‘ॲग्रीस्टॅक’ कार्यक्रमामार्फत आज संपूर्ण शेतीचे डिजिटायझेशन होत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘क्रॉप सायकल मॅनेजमेंट‘मध्ये या सगळ्या डेटाचा वापर करता येईल. शेतीमध्ये AI च्या वापरासाठी ₹500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. सर्व कृषी विद्यापीठांनी AI मिशन सुरू करावे. यासोबतच कृषी विभागामार्फत ॲप तयार करून लागवडीच्या विविध पद्धती, कीड व्यवस्थापन, तसेच विविध वाणांची माहिती शेतकर्‍यापर्यंत पोहचवण्याचे काम सुरू आहे. आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे की महाराष्ट्र ‘साथी’ पोर्टलवर ‘ट्रूथफूल’ बियाण्यांची नोंद करणारे पहिले राज्य ठरले आहे. राज्यभरात आम्ही नव्या लागवडीच्या पद्धतींचा देखील प्रचार व प्रसार करत आहोत. यातील Chat Bot ला मराठीत प्रश्न विचारता येतो. हे ॲप ‘शेतकर्‍यांचा डिजिटल मित्र’ ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये ₹4000 कोटींच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून 7000 गावांना फायदा होणार आहे. यासोबतच मॅग्नेट, ॲग्री बिझनेससारख्या योजनांचा एकात्मिक विचार केल्यास शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल करणे शक्य आहे. शेती क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत, शेतकर्‍यांना स्थैर्य द्यायचे आहे. या बैठकीच्या माध्यमातून होणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या निर्णयांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम शासन आणि विद्यापीठांच्या माध्यमातून करू असेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले.

यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.