Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

तुमच्या घरात मी माझी कबर खोदून ठेवली आहे...! कवितेचा पाडवा : भावस्पर्शी कविसंमेलनात ऐक्याचा संदेश

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 01 April 2025 06:53 PM

तुमच्या घरात मी माझी कबर खोदून ठेवली आहे...!

कवितेचा पाडवा : भावस्पर्शी कविसंमेलनात ऐक्याचा संदेश


दखनी स्वराज्य, जालना ( प्रतिनिधी) : 
"मला एक सांगायचे निक्षून
मला तुमच्या पासून वेगळे काढता येणार नाही
यदा कदाचित झालेच काही बरे वाईट तर तुमच्या घरातच मी माझी कबर खोदून ठेवली आहे."

सापापेक्षाही विषारी झालेली माणसं, दुष्काळ महागाई अवघड झालेलं जगणं, कबरी वरून सुरू असलेले  राजकारण, बहिण-भावाच्या नातेसंबंधातील आर्त हाक, 
अशा सामाजिक वास्तवांवर आधारित बहारदार रचनांससह कवितेचा पाडवा कार्यक्रमातील कविसंमेलनात कवींनी ऐक्याचा संदेश दिला. 

जे.ई.एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात "दु:खी" व "ना.धों.महानोर" राज्य साहित्य पुरस्कार वितरणानंतर झालेल्या निमंत्रित कवींच्या कविसंमेलनात कवी-गीतकार प्रकाश होळकर ( लासलगाव), सूरज रफीक ( कोल्हापूर), लता ऐवळे ( सांगली), सुनील उबाळे ( छत्रपती संभाजी नगर) यांनी विविध विषयांवर आधारित एकापेक्षा एक सरस रचना सादर केल्या. त्यांना रसिकांनी तेव्हढाच उत्तम प्रतिसाद दिला.

संपत्तीवरून बहिण-भावंडात काही ठिकाणी वितुष्ट आल्याचे चित्र दिसते. मात्र  बहुतांशी बहिणींची भावाकडे असलेली निरपेक्ष तथा माफक अपेक्षा लता ऐवळे यांनी मांडली. 

"तुझी काकरी नको रे..
तुझा बांधही नको रे..
तुझ्या भरल्या घरात..
मला कोपरा असू दे"
यासह लोकप्रिय असणारी बाप या कवितेसही उपस्थितांनी दाद दिली. 

 ''दिला शबूद मी त्याला
शेवटच्या वक्ताला
माझं जीवन घडविण
नाव तूमचंच घेताना''



दिवसेंदिवस लुप्त होत चाललेली माणुसकी सापापेक्षाही विषारी का होत आहेत, याचा शोध कवी सुनील उबाळे यांनी घेतला. 

"माणसांची आदळ असणाऱ्या ठिकाणी
सापं फिरकत नाही
सापांची बिळं उद्ध्वस्त करुन
माणसं राहू लागलीत
कदाचित
 हेही एक कारण असू शकते
माणसं विषारी होण्यामागचं"

दुष्काळ हा शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेला प्रकल्प होतात मात्र शेतीला अजूनही मुबलक पाणी मिळत नाही.  पाणी शोधताना शेतात, रानात  होत असलेली ससेहोलपट तरीही मेघाकडून पाणी मागणाऱ्या बळीराजाची आर्त विनवणी प्रकाश होळकर यांनी सुरेल लयबद्ध रचनेतून विषद केली. 

'माझे आभाळ तुला घे 
तुझे आभाळ मला 
आठवांच्या पारंबीला 
बांधू एक झुला 

माझा झुला तुला घे 
तुझा झुला मला 
वाऱ्यावर पसरला 
मखमली शेला'
या बहारदार कवितेने कविसंमेलनाचा समारोप झाला. रवींद्र मगर यांनी बहारदार केलेले निवेदन व कोट्यांनी रसिक तृप्त झाले. 
पंडितराव तडेगांवकर यांनी शेवटी आभार मानले. उत्तोरोत्तर रंगत गेलेल्या या कविसंमेलनाला कधी स्तब्ध, नि:शब्द, अंतर्मुख होत  मराठवाड्यासह विदर्भातील साहित्य रसिकांनी सुध्दा हजेरी लावून कार्यक्रमाचा अस्वाद घेतला.